08/15/2025
मी फारसा बोलत नाही.
आपल्या कुटुंबाबद्दल, त्यागाबद्दल, परंपरेबद्दल काहीच कधी उघडपणे मांडलं नाही.पण या १५ ऑगस्टला काहीतरी वेगळं वाटलं म्हणुन हा एक छोटा प्रयत्न.
पहिल्यांदाच वडिलांसोबत त्यांच्या कार्यालयात झेंडावंदन पाहिलं.त्या क्षणी, तिरंगा वर जाताना, माझ्या मनात एक विचार येऊन गेला :
आजोबा भारतीय नौदलात होते.
पाकिस्तानविरुद्ध तीन युद्धं लढली — कधी बोलून दाखवलं नाहीत त्यांनी, पण त्यांच्या डोळ्यात देशासाठी असलेली निःशब्द निष्ठा कायम दिसायची.
वडील — गेली ३० वर्षं भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी.शिस्त, संयम आणि जबाबदारी म्हणजे त्यांचं दुसरं नाव.त्यांच्यासोबत उभा राहताना मला वाटलं — ही केवळ एक घटना नव्हती,ही परंपरेची एक साखळी होती — जिचा मी एक दुवा आहे.
आईचे वडील, म्हणजे माझे आजोबा — २५ वर्षं आमदार होते.त्यांचं जनतेशी नातं हे राजकारणापलीकडचं होतं — लोकांचा विश्वास त्यांची खरी ताकद आहे.
आईबाबतीत नेहमी वाटतं — ती मंत्रिपद मिरवत नाही, ती लोकांशी नातं जपते.लोकांच्या प्रत्येक अडचणीत तिचा फोन सतत वाजतो,आणि तीही शांतपणे, कोणताही थाट न करता, "हो, बघते लगेच" म्हणते — तेही संध्याकाळ असो की मध्यरात्र.
त्या झेंड्याची दोरी ओढताना जी ऊर्जा जाणवली —ती केवळ ध्वजवंदनाची नव्हती, ती होती पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या सेवेच्या भावनेची आठवण.
ही पोस्ट कोणी पाहावी म्हणून नाही,
तर स्वतःला आठवण करून द्यावी म्हणून.
आपण कुठून आलोय, कोणत्या माणसांमध्ये वाढलोय,आणि आपण काय जपतोय — हे विसरू नये म्हणून.
आणि शेवटी,
ज्यांच्या मुळे आपला तिरंगा अभिमानाने फडकतो —त्या प्रत्येक सैनिक, पोलिस, शेतकरी, डॉक्टर, शिक्षक, शासकीय अधिकारी आणि सेवकाला मनापासून धन्यवाद आणि सलाम...